कधी आलो? कोण्या रोजी? किती राहीन टिकून?
कोण जाणे अचानक कधी जाईन निघून
किती जगलो तयाचा हवा कोणा इतिहास?
वाढदिवसाचा मग कशापाई अट्टाहास?
येतेवेळी कोणासवे काही आलेले नसते
जातेवेळी पण नाही काही संगे नेता येते
कशासाठी मग हवी भेटी–देणग्यांची रास?
अंती उरते न काही हवा कशाला हव्यास?
जन्माआधी काय खाई कोणालाही नाही ठावे
मृत्यूपरांतचे पण कोडे कसे उमजावे?
तीळतांदळाचा पिण्ड फक्त कावळयांचा घास
पंचपक्वान्नांचा मग घ्यावा कशासाठी ध्यास?
घालवावी मुलाबाळांसवे वर्षें उरलेली
नातवंडांनी असावे बागडत भोवताली
कौतुकाने पाहताना घ्यावा शेवटचा श्वास
आणि करावे प्रयाण अखेरीच्या प्रवासास
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा